दुर्गराज रायगड ते भूवैकुंठ पंढरपूर : श्री शिवछत्रपती पालखीचे रविवारी अकलूजमध्ये आगमन


दुर्गराज रायगड ते भूवैकुंठ पंढरपूर : श्री शिवछत्रपती पालखीचे रविवारी अकलूजमध्ये आगमन

अकलूज, प्रतिनिधी :

दुर्गराज श्री रायगड येथून भूवैकुंठ पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या श्री शिवछत्रपतींच्या पालखीचे अकलूज येथे रविवार, दि. १९ जुलै रोजी सकाळी ९ वाजता आगमन होणार असून, या निमित्ताने अकलूज व परिसरातील शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मार्गदर्शक संदीप महिंद गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली ही पालखी गेल्या अनेक वर्षांपासून दुर्गराज रायगड ते पंढरपूर असा प्रेरणादायी प्रवास करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, स्वराज्याची प्रेरणा आणि हिंदवी संस्कृतीचा जागर देशभर पोहोचविण्याचे कार्य या पालखीच्या माध्यमातून सातत्याने केले जात आहे.

पालखीच्या स्वागतासाठी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८.३० वाजता सराटी येथील पुलावर श्री शिवछत्रपतींचे पुरुषार्थी निरास्नान, त्यानंतर सकाळी ९ वाजता सोलापूर जिल्ह्यात प्रवेश, सकाळी ९.३० वाजता गांधी चौक येथे भव्य स्वागत, सकाळी १० वाजता विजय चौक येथे बालगोपाल रिंगण, तर दुपारची विश्रांती महादेव मंदिर, अकलूज येथे होणार आहे.

या सोहळ्यानिमित्त सर्व धारकऱ्यांनी पारंपरिक वेशभूषेत सकाळी ८.३० वाजता सराटी पुलावर उपस्थित राहावे, तसेच नेहमीप्रमाणे घरून जेवणाचा डबा घेऊन सकाळी ११ वाजता महादेव मंदिर येथे उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री शिवछत्रपतींच्या पालखीचे दर्शन घेऊन या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


49
कृपया वोट करा

स्वराज्य हेरच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!