माळशिरस तालुक्यात वाघमारे परिवाराची शिवसेनेतील परंपरा कायम; विराज वाघमारे यांची युवा सेना युवा अधिकारीपदी नियुक्ती

प्रतिनिधी | माळशिरस
माळशिरस तालुक्यात शिवसेनेचा भगवा गावागावांत पोहोचवून संघटना मजबूत करण्यासाठी आयुष्यभर झटलेले स्वर्गीय पैलवान दत्ता आप्पा वाघमारे यांचे कार्य आजही शिवसैनिकांसाठी प्रेरणादायी मानले जाते. गावखेड्यांपासून पंचायत समितीपर्यंत शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. हिंदुत्वाच्या विचारासाठी आणि शिवसेनेच्या संघटन बांधणीसाठी त्यांनी केलेले योगदान आजही तालुक्यात आवर्जून स्मरणात ठेवले जाते.
माळशिरस तालुका प्रमुख म्हणून सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवास पुढे शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू आणि लाडके कार्यकर्ते म्हणून ओळख निर्माण करणारा ठरला. आपल्या नेतृत्वगुणांमुळे आणि धाडसी स्वभावामुळे त्यांना माळशिरस तालुक्याचा “ढाण्या वाघ” म्हणूनही ओळखले जात असे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शिवसैनिक घडले आणि संघटनेला बळकटी मिळाली.
स्वर्गीय दत्ता आप्पा वाघमारे यांच्या पश्चात शिवसेनेची तालुक्यातील धुरा त्यांचे बंधू पैलवान नामदेव (नाना) वाघमारे यांनी समर्थपणे सांभाळली. त्यानंतर आप्पांचे चिरंजीव स्वप्निल वाघमारे यांनी युवा सेनेत काम करत सोलापूर जिल्हा युवा सेना प्रमुख पदापासून ते महाराष्ट्र राज्य सहसचिव पदापर्यंत कुच केली तेही आपल्या कामाच्या जीवावर .शिवसेनेच्या पडत्या काळामध्ये माळशिरस तालुक्यातील अनेक नेते मंडळी आले आणि गेले परंतु ,आजही वाघमारे परिवार शिवसेनेशी आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाशी एकनिष्ठ असल्याचे कार्यकर्त्यांमध्ये मानले जाते.
याच परंपरेचा वारसा पुढे नेत पैलवान नामदेव (नाना) वाघमारे यांचे चिरंजीव पैलवान विराज वाघमारे यांची माळशिरस तालुका युवा सेना युवा अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून, संपूर्ण माळशिरस तालुक्यात त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
संघटनात्मक कार्याची परंपरा, जनसामान्यांशी असलेला संपर्क आणि वाघमारे परिवाराने वर्षानुवर्षे जपलेली कार्यकर्त्यांची फळी यामुळे विराज वाघमारे हे आपल्या नव्या पदाला निश्चितच न्याय देतील, असा विश्वास शिवसैनिक आणि सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.
“जनसामान्यांचा आधार… वाघमारे परिवार” ही ओळख आजही कायम असून, वाघमारे परिवाराची शिवसेनेप्रती असलेली निष्ठा आणि संघटनात्मक कार्य भविष्यातही अशाच ताकदीने सुरू राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






