बागेचीवाडीतील अन्यायकारक भारनियमनाविरोधात रणरागिणींचा एल्गार; दोन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास महावितरण कार्यालयाला घेरावाचा इशारा


बागेचीवाडीतील अन्यायकारक भारनियमनाविरोधात रणरागिणींचा एल्गार; दोन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास महावितरण कार्यालयाला घेरावाचा इशारा

अकलूज | प्रतिनिधी गणेश इंगळे.

बागेचीवाडी गावात गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेल्या अन्यायकारक व अवेळी भारनियमनाविरोधात गावातील महिलांनी तीव्र संताप व्यक्त करत महावितरण कंपनीच्या अकलूज कार्यालयावर धडक दिली. राजेश्वरी कृष्णराज माने-पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ महिलांनी कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर करून तात्काळ भारनियमन बंद करून नियमित वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी केली.

गावात दररोज सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागातील दैनंदिन जीवनावर या अवेळी लोडशेडिंगचा गंभीर परिणाम होत असल्याकडेही राजेश्वरी माने-पाटील यांनी लक्ष वेधले.

यावेळी त्यांनी इशारा देत सांगितले की, “महावितरणने दोन दिवसांच्या आत बागेचीवाडीतील भारनियमन पूर्णपणे बंद करून नियमित वीजपुरवठा सुरू केला नाही, तर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडत महावितरण कार्यालयाला घेराव घालण्यात येईल.”

या आंदोलनात राजेश्वरी कृष्णराज माने-पाटील, ग्रामपंचायत सदस्या इंगळे मॅडम यांच्यासह गावातील बहुसंख्य महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.

दरम्यान, महावितरण कंपनी अकलूजचे कार्यकारी अभियंता यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून येत्या दोन दिवसांत बागेचीवाडी गावातील भारनियमन बंद करून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आता महावितरण आपल्या आश्वासनाची कितपत पूर्तता करते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.


49
कृपया वोट करा

स्वराज्य हेरच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!