निर्जनस्थळी सोडून दिलेल्या जखमी वासरासाठी ‘गोरक्षक’ सरसावले; शिवाजीराव घोडके व संतोष जाधवांचा पुढाकार.

अकलूज (प्रतिनिधी): स्वराज्य हेर
माणुसकी आणि गोसेवेचा एक जिवंत प्रत्यय अकलूजमध्ये पाहायला मिळाला. येथील कृष्णप्रिया नगर, नायकुडे वस्ती परिसरातील निर्जन ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून सोडून दिलेल्या एका गंभीर जखमी वासराला स्थानिक नागरिक आणि गोप्रेमींच्या तत्परतेमुळे जीवदान मिळाले आहे. ‘गोमाता हीच राष्ट्रमाता’ हा विचार उराशी बाळगून या वासराला पुढील उपचारासाठी ‘जाणता राजा’ गोशाळेत दाखल करण्यात आले आहे.
काय आहे नेमकी घटना?
नायकुडे वस्तीच्या पाठीमागे एका वासराचा उजवा पाय मोडलेल्या अवस्थेत असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. हाड बाहेर आले होते आणि जखमेत आळ्या पडल्याने वासरू असह्य वेदनेने विव्हळत होते. स्थानिक नागरिक सुनील पिसे यांनी ही बाब पाहताच तात्काळ त्यांचे मित्र सारंग मोरे यांना पाचारण केले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा सहमंत्री श्री. शिवाजीराव घोडके यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर श्री. घोडके आपल्या टीमसह तातडीने घटनास्थळी पोहोचले.आणि संग्रामनगर (रत्नपुरी-१६) येथील ‘जाणता राजा’ गोशाळेचे सर्वेसर्वा संतोष जाधव यांना मदतीसाठी पाचारण केले.
तत्काळ उपचार आणि बचाव कार्य:
वासराची खालावलेली अवस्था पाहून स्थानिक नागरिकांनी यापूर्वीच डॉक्टरांच्या मदतीने त्याला वेदनाशामक इंजेक्शन व स्प्रे दिला होता. संतोष जाधव यांनी कसलाही विलंब न लावता स्वतःचे वाहन आणले आणि वासराला काळजीपूर्वक गाडीत घालून पुढील उपचारासाठी गोशाळेत हलवले. यावेळी उपस्थित सारंग मोरे भावूक झाले होते. “अशा प्रकारे गोमातेला बेवारस सोडून देणाऱ्या मालकांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हायला हवी,” अशी तीव्र भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
गोसेवेसाठी मदतीचे आवाहन:
याप्रसंगी मार्गदर्शन करताना श्री. शिवाजीराव घोडके म्हणाले, “गाय ही आपली राजमाता असून तिची सेवा करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. गोसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे.”
‘जाणता राजा’ गोशाळेचे संतोष जाधव यांनी सांगितले की, “कोणतेही शासकीय अनुदान नसताना आम्ही केवळ स्वखर्चातून आणि गोप्रेमींच्या जोरावर हे कार्य करत आहोत. परिसरात अशा अनेक गोमाता बेवारस स्थितीत आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे. आगामी उन्हाळा पाहता गोवंशासाठी चाऱ्याची मोठी टंचाई भासणार आहे. माझी सर्व हिंदू बांधवांना विनंती आहे की, आपल्या जन्मदिनी वायफळ खर्च करण्यापेक्षा तो निधी गोमातेच्या चाऱ्यासाठी देऊन या पवित्र कार्यात आपला खारीचा वाटा उचलावा.”

यांची लाभली उपस्थिती:
हे सेवाकार्य पूर्णत्वास नेण्यासाठी विश्व् हिंदू परिषद जिल्हासहामंत्री शिवाजीराव घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सारंग मोरे, संतोष जाधव, सुनील पिसे, राहुल माने-देशमुख, हिंदू जागरणचे महेश वगरे, स्वयंसेवक प्रवीण रोडे, धारकरी सुधीर पवार, शंभू माने व अन्य स्थानिक नागरिक आणि गोरक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
📍
जाणता राजा गोशाळा, संग्रामनगर (रत्नपुरी-१६)
संपर्क: संतोषराव जाधव – ९५४५७७७०७३.
गोशाळेस मदद करण्यासाठी खाली स्कॅनर देण्यात येत आहे…. आपण त्यावर आपली मदद पाठवू शकता…

चला,आपल्या संस्कृतीचे रक्षण करूया… गोवंश वाचवूया!भारत माता की जय! गोमाता की जय! जय श्रीराम! 🚩







