किल्ले राजगडाने जिंकले परदेशी मन; ऑस्ट्रेलियन प्रवासी भारावला, शिवरायांविषयी व्यक्त केला अपार आदर
रायगड प्रतिनिधी:
सह्याद्रीच्या कुशीत वसलेला ऐतिहासिक राजगड किल्ला पुन्हा एकदा जागतिक स्तरावर चर्चेत आला आहे. ऑस्ट्रेलियातील प्रवासी Liam Richards याने नुकतीच राजगडाला भेट देत किल्ल्याच्या भव्यतेने आणि इतिहासाने प्रभावित झाल्याची भावना व्यक्त केली.
लिम रिचर्ड्सने आपल्या यूट्यूब चॅनेलवर “The man that SAVED India.. Chhatrapati Shivaji Maharaj” या शीर्षकाखाली व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल प्रचंड आदर व्यक्त करत, “महाराजांमुळे भारत वाचला,” असे ठाम मत मांडले आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे भारतीय इतिहासाबद्दल परदेशी पर्यटकांमध्ये असलेले आकर्षण आणि आदर पुन्हा अधोरेखित झाला आहे.

राजगड किल्ल्यावर फिरताना लिमने किल्ल्याच्या रचनेचे, मजबूत बांधकामाचे आणि भव्य विस्ताराचे बारकाईने निरीक्षण केले. पाली दरवाजा, राजवाडा, बुरुज तसेच सुवेळा माची यांसारख्या ऐतिहासिक स्थळांचे चित्रीकरण करताना त्याने मराठा साम्राज्याच्या वैभवाचा आढावा घेतला. यावेळी “छत्रपती शिवाजी महाराज की जय” अशा घोषणा देत त्याने आपली भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली.
इतिहासाचा उल्लेख करताना त्याने वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी शिवाजी महाराजांनी राजगड जिंकून त्याचे संवर्धन केल्याची माहितीही दिली. तसेच मुघल, इंग्रज आणि शहाजी राजे भोसले यांच्याशी संबंधित घटनांचा उल्लेख करत त्याने किल्ल्याचा ऐतिहासिक संदर्भ स्पष्ट केला.
यापूर्वी सिंहगड किल्ला आणि जंजिरा किल्ला यांना भेट दिल्याचे सांगत, “राजगडसारखा सुंदर किल्ला मी यापूर्वी पाहिलेला नाही,” असेही तो म्हणाला. स्थानिक पर्यटकांशी संवाद साधताना त्याने आपल्या माहितीमध्ये काही त्रुटी असल्यास त्या दुरुस्त करण्याची नम्र विनंती केली.
राजगडाच्या निसर्गरम्य वातावरणाने आणि ऐतिहासिक वैभवाने मंत्रमुग्ध झालेल्या लिम रिचर्ड्सने पावसाळ्यात पुन्हा एकदा येथे भेट देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
एकूणच, सह्याद्रीतील गड-किल्ल्यांचे आकर्षण केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून ते जगभरातील पर्यटकांना खुणावत असल्याचे या घटनेतून पुन्हा सिद्ध झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि राजगडासारख्या किल्ल्यांची भव्यता आजही जगाला प्रेरणा देत आहे.






