अकलूज येथे ‘आत्मनिर्भर भारत’ विषयावर व्याख्यान; DRDOचे निवृत्त शास्त्रज्ञ काशिनाथ देवधर यांचे मार्गदर्शन

अकलूज (प्रतिनिधी)
अकलूज येथे ‘आत्मनिर्भर भारत’ या महत्त्वपूर्ण विषयावर DRDOचे निवृत्त शास्त्रज्ञ श्री. काशिनाथ देवधर यांचे प्रभावी व्याख्यान पार पडले. या वेळी त्यांनी भारताच्या संरक्षण क्षेत्रातील सध्याची प्रगती, विविध संशोधन प्रकल्प आणि देशाच्या वाढत्या लष्करी सामर्थ्याबाबत सविस्तर माहिती दिली.
देवधर यांनी आपल्या चार दशकांच्या DRDO मधील सेवेत केलेल्या संशोधनाचा आढावा घेत, त्यांनी विकसित केलेल्या काही अत्याधुनिक युद्धसामग्रीचा परिचय उपस्थितांना करून दिला. तसेच त्यांनी संरक्षण क्षेत्रातील तांत्रिक प्रगतीमुळे भारत कसा आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे, हे उदाहरणांसह स्पष्ट केले.
व्याख्यानादरम्यान त्यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला. तसेच कारगिल युद्ध काळातील प्रत्यक्ष कामाचे अनुभव सांगत, त्या काळातील आव्हाने आणि भारतीय सैन्याची जिद्द यांचे जिवंत चित्र उभे केले.
भारतीय भूदल, नौदल आणि हवाई दल या तिन्ही संरक्षण दलांमधील अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची सचित्र माहिती देत त्यांनी उपस्थितांना देशाच्या संरक्षण क्षमतेची ओळख करून दिली.
या कार्यक्रमास अकलूज व परिसरातील डॉक्टर, पत्रकार, वकील, शिक्षक, आदी विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेबाबत नव्याने प्रेरणा घेतली.







