वायफळ खर्चाला फाटा देत ‘छत्रपती प्रतिष्ठान’चा स्तुत्य उपक्रम; इंदापूर येथील मूकबधिर विद्यालयात अन्नदान व शालेय वस्तूंचे वाटप


“मूकबधिर मुलांच्या चेहऱ्यावर फुलले हसू! छत्रपती प्रतिष्ठानचा १० व्या वर्षाचा ‘शिवजन्मोत्सव’ अनोख्या पद्धतीने साजरा”

अकलूज/इंदापूर:प्रतिनिधी

अखंड हिंदूस्थानचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून, अकलूज येथील ‘छत्रपती प्रतिष्ठान’च्या वतीने यंदा सामाजिक बांधिलकीचा एक आदर्श पायंडा घालून देण्यात आला. शिवजयंतीच्या १० व्या वर्षात पदार्पण करत असताना,वायफळ खर्चाला पूर्णपणे आळा घालून, इंदापूर येथील मूकबधिर संस्थेतील मुलांना अन्नदान, शालेय साहित्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून आगळ्यावेगळ्या पद्धतीने ‘शिवजन्मोत्सव’ साजरा करण्यात आला.

छत्रपती प्रतिष्ठान गेली नऊ वर्षे अकलूज शहरात ‘अन्नदान हेच श्रेष्ठ दान’ या संकल्पनेतून शिवजयंती साजरी करत आहे. यंदाच्या दहाव्या वर्षी प्रतिष्ठानने आपला हा उपक्रम अधिक व्यापक करत इंदापूर येथील मूकबधिर विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला. शुक्रवार, १३ फेब्रुवारी २०२६ रोजी हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

यावेळी मूकबधिर मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून उपस्थितांनी प्रतिष्ठानच्या निर्णयाचे कौतुक केले. केवळ जल्लोष न करता समाजातील दुर्लक्षित घटकांना आधार देणे हीच खरी शिवभक्ती असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.

मान्यवरांची उपस्थिती :

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून धनाजी साखळकर (समन्वयक, मराठा क्रांती ठोक मोर्चा महाराष्ट्र राज्य), सौ. डॉ. श्रद्धाताई जंजाळ (कार्यकारी अध्यक्ष, सहारा इन्स्टिट्यूट), श्रीमती शारदाताई चव्हाण (अध्यक्षा, जिजाऊ ब्रिगेड माळशिरस तालुका), गणेशजी इंगळे (युवा सेना जिल्हाप्रमुख), डॉ. अनिल शिर्के (अध्यक्ष, डॉक्टर असोसिएशन इंदापूर) हे उपस्थित होते.

तसेच संदीप दादा भोसले, पै. रंजीतभैय्या पवार, रामभाऊ वाजबे (इंदापूर शहराध्यक्ष, भाजप), लक्ष्मणजी काळे, भारत यादव, अमितजी घाडगे, संदीपजी काळे, मनीषजी पवार, ओंकारभैय्या शिरसागर यांसह इतर मान्यवर आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आयोजन आणि सहकार्य :

या संपूर्ण उपक्रमाचे नेटके नियोजन छत्रपती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष आशु भाऊ ढवळे यांनी केले होते. इंदापूर मूकबधिर संस्थेचे प्राध्यापक श्री. उन्हाळे सर यांनी संस्थेच्या वतीने प्रतिष्ठानचे आभार मानले.

“शिवजयंती म्हणजे केवळ मिरवणूक नव्हे, तर महाराजांच्या विचारांचा वारसा जपणे होय. वायफळ खर्च टाळून तोच पैसा सामाजिक कार्यासाठी वापरल्यास खऱ्या अर्थाने रयतेच्या राजाचे विचार जिवंत राहतील,” अशा भावना याप्रसंगी व्यक्त करण्यात आल्या.

छत्रपती प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


49
कृपया वोट करा

स्वराज्य हेरच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!