सोलापूर जिल्ह्यात घुमणार आता पारंपरिक वाद्यांचा गजर; पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या ‘नो डीजे, नो डॉल्बी’ मोहिमेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद.


कर्णकर्कश आवाजाला फाटा; सामाजिक आणि आरोग्यहिताच्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक

अकलूज-प्रतिनिधी रणजितदादा गायकवाड.

सोलापूर जिल्ह्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पदभार स्वीकारल्यापासून जनहिताचे अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत. यामध्ये त्यांनी सुरू केलेल्या ‘नो डीजे, नो डॉल्बी’ या मोहिमेला संपूर्ण जिल्ह्यातून प्रचंड प्रतिसाद मिळत असून, सर्वसामान्य नागरिकांमधून या उपक्रमाचे मोठे कौतुक होत आहे. या निर्णयामुळे यंदाचा शिवजयंती उत्सव आणि आगामी यात्रा-उत्सव पारंपरिक आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरे होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आरोग्य आणि शांततेचा विचार

गेल्या काही वर्षांपासून लग्नसोहळे, मिरवणुका, वाढदिवस आणि सार्वजनिक उत्सवांमध्ये मोठ्या प्रमाणात कर्णकर्कश आवाजाचे डीजे आणि डॉल्बी सिस्टीम लावली जात होती. या आवाजाचा वृद्ध, लहान मुले आणि रुग्णांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत होता. अनेकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत होते. ध्वनी प्रदूषणामुळे सामाजिक शांतताही धोक्यात आली होती. ही बाब लक्षात घेऊन अत्यंत शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अतुल कुलकर्णी यांनी जिल्ह्यात ‘नो डीजे, नो डॉल्बी’चा नारा दिला.

शिवजयंतीत पारंपरिक वाद्यांची मोहिनी

पोलीस अधीक्षकांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सोलापूर जिल्ह्यातील अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक मंडळांनी यंदा डीजेला फाटा दिला आहे. सध्या सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवात याचे प्रतिबिंब उमटताना दिसत आहे. मंडळांनी डीजेऐवजी पारंपरिक लेझीम, सनई-चौघडा, ढोल-ताशे, हलगी अशा पारंपरिक वाद्यांना पसंती दिली आहे. तसेच, ऐतिहासिक देखावे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर भर देऊन उत्सवाचे स्वरूप अधिक मंगलमय आणि वैचारिक केले आहे.

प्रबोधनावर भर, तरीही नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई

अतुल कुलकर्णी यांनी केवळ आदेश न काढता, सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारींना सूचना दिल्या आहेत की, त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधावा. डीजेचे दुष्परिणाम, ध्वनी प्रदूषण आणि आरोग्याला असलेला धोका समजावून सांगण्यावर त्यांनी भर दिला आहे. मात्र, एवढे करूनही जर कोणी नियमांचे उल्लंघन करून डीजे किंवा डॉल्बी लावल्यास, ती यंत्रणा जप्त करून संबंधितांवर कडक कायदेशीर गुन्हे दाखल करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

जनतेतून कौतुकाचा वर्षाव

अतुल कुलकर्णी यांच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिक, विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी समाधान व्यक्त केले आहे. पोलिसांच्या या संवेदनशील भूमिकेमुळे सण-उत्सव आता खऱ्या अर्थाने आनंददायी आणि आरोग्यदायी होणार आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या या कार्याचे सोलापूर जिल्ह्यात सर्व स्तरांतून अभिनंदन केले जात आहे.

 


45
कृपया वोट करा

स्वराज्य हेरच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!