बोरामणीत दावल मलिक बाबा दर्गा परिसरातील अतिक्रमणे जमीनदोस्त
विधिमंडळात प्रश्न उपस्थित झाल्यानंतर तब्बल वर्षभराने वनविभागाची मोठी कारवाई
सोलापूर प्रतिनीधी:
सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यात असलेल्या बोरामणी येथील दावल मलिक बाबा पीर देवस्थान परिसरातील अतिक्रमणांवर अखेर वनविभागाने मोठी कारवाई करत बुधवारी दि. ६ मे रोजी अवैध बांधकामे जमीनदोस्त केली. राखीव वनक्षेत्रात उभारण्यात आलेल्या पत्र्याच्या शेड, टपऱ्या, पक्की बांधकामे आणि पाण्याच्या टाक्यांवर बुलडोझर चालवत प्रशासनाने कठोर पाऊल उचलले. विशेष म्हणजे, विधिमंडळात हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर तब्बल वर्षभराने ही कारवाई करण्यात आल्याने प्रशासनाच्या भूमिकेवरही चर्चा सुरू झाली आहे.

बोरामणी येथील गट क्रमांक ७६९ (जुना सर्व्हे नं. ३३८) हा परिसर १८८४ पासून राखीव वनक्षेत्र म्हणून नोंदवण्यात आला आहे. महसूल अभिलेखानुसार या जागेवर केवळ पूजाअर्चेसाठी जाण्याचा अधिकार देण्यात आला होता. मात्र कालांतराने येथे अनधिकृत पत्राशेड, टपऱ्या, खोल्या तसेच पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्याचे वनविभागाच्या निदर्शनास आले होते.

गेल्या पावसाळी अधिवेशनात विदर्भातील आमदार सुनील कांबळे यांनी हा मुद्दा विधिमंडळात उपस्थित करत, “राखीव वनक्षेत्रात होत असलेल्या अनधिकृत बांधकामांवर वनविभाग काय कारवाई करणार?” असा सवाल उपस्थित केला होता. त्यावेळी शासनाकडून अतिक्रमण हटवण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानंतर जून २०२५ मध्ये वनविभागाने या प्रकरणी गुन्हा नोंदवत दर्गा ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या होत्या. मात्र संबंधितांकडून मालकीचे ठोस पुरावे अथवा कागदपत्रे सादर करण्यात अपयश आल्याने अखेर प्रशासनाने थेट कारवाईचा मार्ग स्वीकारला.

बुधवारी सकाळी सहा वाजल्यापासून ही मोहीम सुरू करण्यात आली. सोलापूरचे उपवनसंरक्षक कुलराज सिंह, ग्रामीण पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली सात वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचे पथक आणि मोठा पोलिस बंदोबस्त घटनास्थळी तैनात करण्यात आला होता. या मोहिमेसाठी चार जेसीबी, चार टेम्पोट्रक, चार ट्रॅक्टर आणि तीन जीप यांसह मोठी यंत्रणा वापरण्यात आली. वनविभागाचे सुमारे ८० कर्मचारी आणि पोलिस विभागाचे ४० कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते.

कारवाईदरम्यान ४० ते ५० जणांच्या जमावाने अतिक्रमण विरोधी पथकास विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र “जागा वनविभागाची असल्याचे सरकारी नोंदीत स्पष्ट आहे. जर ही जागा देवस्थानच्या मालकीची असल्याचे पुरावे असतील तर ते सादर करा, अन्यथा शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात येतील,” असा इशारा प्रशासनाने दिल्यानंतर जमाव मागे हटला.

यानंतर वनविभागाने पत्राशेड, पक्क्या खोल्या तसेच पाण्याच्या टाक्यांसह सर्व अनधिकृत बांधकामे हटवून परिसर मोकळा केला. या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी चर्चा रंगली असून, राखीव वनक्षेत्रातील अतिक्रमणांविरोधात प्रशासन आणखी कठोर भूमिका घेणार का याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.







