सात वर्षांनंतर न्याय; पत्नी छळप्रकरणी पतीला ७ वर्षांची शिक्षा
अकलूज प्रतिनिधी गणेश इंगळे
ऐरोली, मुंबई येथील फिर्यादी जेजरथ दशरथ भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकलूज पोलीस ठाण्यात २०१६ साली दाखल झालेल्या पत्नी छळ व मृत्यूप्रकरणी न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल देत मुख्य आरोपी रविंद्र बिभीषण आढाव याला दोषी ठरवत ७ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
या प्रकरणी आरोपी रविंद्र बिभीषण आढाव व इतर सात जण, सर्व रा. गट नंबर २, महाळुंग ता. माळशिरस यांच्याविरोधात अकलूज पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक १७५/२०१६ अन्वये भा.दं.वि. कलम ४९८ (अ), ३०६, ३०४ (बी), ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक सारंग चव्हाण यांनी करून आरोपीविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले होते. या प्रकरणाची सुनावणी मा. श्री. ताम्हाणेकर, अपर जिल्हा व सत्र न्यायाधीश, माळशिरस यांच्या न्यायालयात झाली.
न्यायालयाने आरोपी रविंद्र बिभीषण आढाव यास दोषी ठरवत —
- भा.दं.वि. कलम ४९८ (अ) अंतर्गत १ वर्ष सश्रम कारावास व २ हजार रुपये दंड,
- कलम ३०६ अंतर्गत २ वर्ष सश्रम कारावास व ३ हजार रुपये दंड,
- तसेच कलम ३०४ (बी) अंतर्गत ७ वर्षे सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त कारावासाची तरतूदही न्यायालयाने केली आहे. दरम्यान, आरोपी क्रमांक २ ते ६ यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.
या खटल्यात उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके, अकलूज पोलीस निरीक्षक निरज उबाळे यांनी मार्गदर्शन केले. सरकारी वकील संग्राम एस. पाटील यांनी प्रभावी बाजू मांडली. तसेच कोर्ट पैरवी अधिकारी पोसई विजय जाधव, पोलीस हवालदार रियाज तांबोळी व हरीष भोसले यांनी कामकाज पाहिले.
(निरज उबाळे)
पोलीस निरीक्षक, अकलूज पोलीस






