अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी रविवार पर्यंत फक्त 8 अर्ज दाखल….
अकलूज (प्रतिनिधी):गणेश इंगळे.
आशिया खंडातील एक नंबरची ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाणारी अकलूज ग्रामपंचायत चे गेल्या तीन वर्षांपूर्वी अकलूज नगर परिषदेमध्ये रूपांतर झाले आहे.स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून अकलूज मध्ये अद्यापही उमेदवारांचा निरुत्साह दिसून येत आहे
अकलूज नगर परिषद निवडणुकीसाठी शनिवार दि.१५ रोजी प्रभाग १३ अ मधून नगरसेवक पदासाठी दत्तात्रय कांबळे यांनी एक उमेदवारी अर्ज दाखल केला.रविवार १६ रोजी किसन माने, अनिल साठे, ज्योती सकट, आशुतोष साठे (2), सुवर्णा साठे (नगराध्यक्ष) यांचा महाराष्ट्र विकास सेना वगिरीश शेटे यांचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तर्फे अर्ज दाखल करण्यात आला.

अनेक जण सोमवारचाच मुहूर्त गाठण्याची शक्यता असल्याने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सोमवारी 17 रोजी दुपारी 3 पर्यंत मुदत असल्यामुळे गर्दी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नगरपरिषद निवडणुकीसाठी गत सोमवार ता. १० पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. परंतू गेल्या पाच दिवसांत एकही अर्ज दाखल करण्यात आला नव्हता. नगरपरिषदेची निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच इच्छुकांची पळापळ सुरू झाली. सर्वच पक्षांनी आपापल्या इच्छुकांच्या मुलाखती घेत त्यांच्याकडून पक्षीय पातळीचे फॉर्म भरून घेतले.
भाजपचे पालकमंत्री जयकुमार गोरे माजी आमदार राम सातपुते यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. भाजपाकडे नगराध्यक्ष पदासाठी १० ते १२ तर प्रत्येक नगरसेवक पदासाठी आठ ते दहा इच्छुक असल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर शिवरत्ननेही आपल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन ठेवल्या. याचप्रमाणे जनसेवा संघटनेचे अध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनीही नगरपरिषद निवडणुकीसाठी पूर्ण तयारी करून ठेवली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत सुरू होण्याआधीच सर्व पक्षांच्या मुलाखती झाल्या होत्या मात्र महाआघाडी आणि युती बाबतच्या चर्चा चालू होत्या.
नगर परिषदेवर वर्चस्व मिळविण्यासाठी महायुती व आघाडीच्या नेत्यांनी घटक पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवण्याची तयारी ठेवली होती. मात्र सर्वच पक्षांनी वेगवेगळ्या मुलाखती घेतल्या असल्याने महायुती व महाआघाडी अशी लढत न होता वेगळ्याच आघाड्या निर्माण होतील अशी चर्चा अकलूजमध्ये रंगत आहे.







