आरळा येथे विराट हिंदू जनआक्रोश मोर्चात हजारोंचा सहभाग

अनिल महाराज देवळेकर यांच्यावरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ मोर्चा; आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली शक्तिप्रदर्शन

वारणावती, दि.११ (प्रतिनिधी)

मनदूर (ता. शिराळा) येथील कट्टर हिंदुत्ववादी शिवव्याख्याते अनिल महाराज देवळेकर यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांच्या निषेधार्थ आरळा येथे विराट हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चामध्ये हजारो हिंदू बांधव सहभागी झाले होते. “जय श्रीराम”च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

मोर्चानंतर झालेल्या सभेत आमदार जगताप यांनी बोलताना, अनिल महाराज देवळेकर यांच्यावर अन्यायकारक पद्धतीने गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप करत निषेध व्यक्त केला. संबंधित प्रकरण विधानसभेच्या अधिवेशनात उपस्थित करून दोषींवर कारवाईची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी ह.भ.प. संग्राम बापू भंडारे, पालवे महाराज, डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते-पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

ह.भ.प. संग्राम बापू भंडारे म्हणाले की, अनिल महाराज देवळेकर यांच्यासह आरळा गावातील काही हिंदू युवकांवर खोटे गुन्हे दाखल करून अन्याय करण्यात आला आहे. समाजाने अशा प्रकारांविरोधात एकजूट दाखविण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

सभेत बोलताना सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी हिंदुत्व, राष्ट्रवाद आणि भारतीय सांस्कृतिक अस्मिता या विषयांवर परखड भूमिका मांडली. हिंदू समाजाने संघटित राहून आपली ओळख व संस्कृती जपण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी सरपंच संजय मरकंड, पालवे महाराज, आरपीआयचे प्रदेश उपाध्यक्ष नानासाहेब वाघमारे यांनीही मनोगत व्यक्त केले. मोर्चामध्ये आमदार सत्यजित देशमुख, हिंदुराव नांगरे, अनिल महाराज देवळेकर यांच्यासह महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ठळक मुद्दा : माजी सरपंच हिंदुराव नांगरे यांचे परखड मत

“आरळा गावात एकूण लोकसंख्येपैकी मुस्लिम समाजाची संख्या केवळ दोन टक्के आहे. असे असतानाही गावाने या समाजातील महिलेला पाच वर्षे सरपंचपद, तसेच याच समाजातील व्यक्तीला दहा वर्षे चेअरमनपद आणि ग्रामपंचायत सदस्यपद दिले आहे. त्यामुळे गावात मुस्लिम समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप वस्तुस्थितीला धरून नाही. काही जिहादी प्रवृत्तीचे लोक खोटे आरोप करून गावाची आणि गावकऱ्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. आरळा गाव नेहमीच सर्व समाजांना न्याय देणारे आणि सामाजिक सलोखा जपणारे गाव राहिले आहे,” असे प्रतिपादन माजी सरपंच हिंदुराव नांगरे यांनी केले.

— स्वराज्यहेर न्यूज

खबर गावाची, बातमी आपल्या कामाची 


48
कृपया वोट करा

स्वराज्य हेरच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!