बलिदान मासाचे पावित्र्य राखत शिवशंभु प्रतिष्ठानकडून शिवजयंती अतिशय शांततेत साजरी; तिथीनुसार होणार मोठा उत्सव

बागेचीवाडी/नवचारी (प्रतिनिधी):स्वराज्यहेर
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरी होत असताना, नवचारी (बागेचीवाडी) येथील ‘श्री शिवशंभु प्रतिष्ठान’ने मात्र धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा ‘बलिदान मास’ (बलिदान महिना) सुरू असल्याने, या शोककाळात कोणताही जल्लोष न करता अतिशय शांततामय वातावरणात शिवजयंती साजरी करण्यात आली. विशेष्ट म्हणजे हे मंडळाचे ११ वे वर्ष आहे.
बलिदान मासाचे भान आणि सामाजिक संस्कृती
छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान काळ हा शिव-शंभू भक्तांसाठी दुःखाचा आणि सुतकाचा काळ मानला जातो. या काळात आनंदाचे उत्सव साजरे न करण्याचा निर्णय ‘श्री शिवशंभु प्रतिष्ठान’ने घेतला. १९ फेब्रुवारी रोजी केवळ महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. मात्र, येणाऱ्या तिथीनुसार शिवजयंती त्याच उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात साजरी केली जाईल, असा निर्धार यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
रियाज शेख यांचा ऐतिहासिक निर्धार
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते माजी उपसरपंच रियाज शेख यांचे मनोगत. ते म्हणाले की, “मी छत्रपती शिवरायांचा मुस्लिम मावळा म्हणून शपथ घेतो की, आजपासून मी सर्व मिष्टान्न वज्र करून हा धर्मवीर बलिदान मास पूर्ण निष्ठेने पाळणार आहे.” त्यांच्या या निर्णयाचे संपूर्ण परिसरात कौतुक होत असून, स्वराज्याप्रती असलेली त्यांची ही निष्ठा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
पुढच्या पिढीला त्याग समजण्यासाठी आचरण गरजेचे – सरपंच माने-पाटील
यावेळी बागेची वाडी गावचे सरपंच श्री. कृष्णराजभैय्या माने-पाटील यांनी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. आपल्या भाषणात ते म्हणाले की, “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा त्याग आणि बलिदान पुढील पिढीला समजण्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरी बलिदान मास पाळला पाहिजे. त्याचे आचरण करणे हीच महाराजांना खरी श्रद्धांजली ठरेल.” पोलीस पाटील बागडे साहेब आणि सुधीर पवार यांनीही यावेळी आपल्या मनोगतातून बलिदान मासाचे महत्त्व विषद केले.
मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याला कांबळे मेंबर, राहुल वाघ, रियाज शेख, असलम भाई, पोलीस पाटील श्री. बागडे साहेब, नामदेव माने, रामभाऊ रोकडे यांच्यासह श्री शिवशंभु प्रतिष्ठानचे रणजीत दादा गायकवाड, सुधीर पवार, गणेश इंगळे, सागर व्यवहारे, तेजस माने, अक्षय चौगुले, अक्षय पवार, घोगरे, अमर जाधव आणि मोठ्या संख्येने शिवप्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते.







