सीमेवरील जवानांसाठी आसबेवस्तीच्या चिमुकल्यांची राखी

फळवणी, ता. माळशिरस | प्रतिनिधी : रणजितदादा गायकवाड.

रक्षाबंधनाच्या पवित्र सणाचे औचित्य साधून फळवणी येथील आसबेवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडीतील इयत्ता पहिली ते चौथीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या वीर जवानांसाठी प्रेमाने राख्या पाठवत आगळ्यावेगळ्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले.

देशाच्या सीमेवर अहोरात्र जागून भारतमातेचे रक्षण करणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने आकर्षक राख्या तयार केल्या. या राख्यांसोबत “तुम्ही सीमेवर जागता म्हणून आम्ही सुरक्षितपणे शिकतो, खेळतो आणि आनंदाने सण साजरे करतो,” असा भावस्पर्शी संदेशही जवानांना पाठविण्यात आला.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या मनात देशप्रेम, राष्ट्रभक्ती, सैनिकांप्रती आदर आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांची रुजवणूक झाली. रक्षाबंधनाचा सण केवळ भाऊ-बहिणीच्या नात्यापुरता मर्यादित न राहता देश आणि देशरक्षक यांच्यातील भावनिक नाते जपणारा ठरला.

मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांनी हा उपक्रम उत्स्फूर्तपणे पूर्ण केला.

“सीमेवर तुम्ही जागता, म्हणून आम्ही सुरक्षित झोपतो,” या भावनेतून आसबेवस्तीच्या चिमुकल्यांनी आपल्या वीर जवानांना मनःपूर्वक सलाम केला.

जय जवान ! जय हिंद ! 🇮🇳


49
कृपया वोट करा

स्वराज्य हेरच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!