“हिंदवी स्वराज्याचे मावळे की लग्नातील शोभेची वस्तू?”

लग्नसराईत सुरू असलेल्या ऐतिहासिक वेशभूषेच्या गैरवापराबाबत संतप्त प्रतिक्रिया

अकलूज प्रतिनिधी : सागर व्यवहारे

सध्या सर्वत्र लग्नसराईचा हंगाम सुरू असून, अनेक विवाह सोहळ्यांमध्ये नवरदेवाच्या वरातीसाठी “मावळ्यांच्या वेशभूषेतील युवक” उभे करून मोठ्या थाटामाटात स्वागत केले जात आहे. डीजेच्या तालावर, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि दिखाव्याच्या वातावरणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचे रूप सादर केले जात आहे. मात्र हा प्रकार पाहून अनेक शिवप्रेमी आणि इतिहासप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

ज्या मावळ्यांनी आपल्या रक्ताचे पाणी करून हिंदवी स्वराज्य उभे केले, ज्या वीरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नासाठी प्राणांची आहुती दिली, त्याच मावळ्यांच्या पवित्र वेशभूषेचा आज केवळ मनोरंजन आणि दिखाव्यासाठी वापर केला जात आहे, ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याची भावना व्यक्त होत आहे.

मावळे हे केवळ पोशाख नव्हते, तर ती एक विचारधारा होती…

त्यांच्या भगव्या फेट्यामागे स्वराज्यनिष्ठा होती, तलवारीमागे धर्मरक्षणाची शपथ होती आणि त्यांच्या प्रत्येक पावलामागे राष्ट्रभक्ती होती. अशा इतिहास घडवणाऱ्या मावळ्यांना आज लग्नातील “इव्हेंट थीम” बनवणे, हा त्यांच्या बलिदानाचा आणि छत्रपतींच्या विचारांचा अपमान नाही का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

आजकाल अनेक ठिकाणी पैशासाठी काही संस्था किंवा कलाकार मावळ्यांचे पोशाख घालून वरातीत नाचताना दिसतात. काही ठिकाणी मद्यधुंद वातावरणातही हेच पोशाख वापरले जातात. त्यामुळे शिवप्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त होत असून, अशा प्रकारांना तात्काळ आळा घालण्याची मागणी होत आहे.

इतिहास हा प्रेरणा देण्यासाठी असतो, करमणुकीसाठी नव्हे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचा सन्मान केवळ घोषणांमध्ये नव्हे, तर कृतीतून जपला गेला पाहिजे. समाजातील सुजाण नागरिक, शिवप्रेमी संघटना आणि प्रशासन यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

“मावळे हे स्वराज्याचे शिलेदार होते, लग्नातील शोभेचे बाहुले नव्हेत,” अशी भावना आता जनतेतून जोर धरू लागली आहे.

 


48
कृपया वोट करा

स्वराज्य हेरच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!