-
अकलूज बाजार समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय: आता आठवड्यातून दोनदा जनावरांचा बाजार
अकलूज प्रतिनीधी:
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी व जनावरे व्यापाऱ्यांच्या वाढत्या मागणीचा विचार करून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे अकलूज येथे दर सोमवारीसोबतच दर शुक्रवारीही जनावरांचा आठवडी बाजार भरणार आहे. या निर्णयामुळे परिसरातील शेतकरी व व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या सूचनेनुसार आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीस बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, तसेच बाजार समितीचे संचालक, शेतकरी आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यापूर्वी अकलूज येथे केवळ दर सोमवारी गुरांचा बाजार भरत होता. मात्र, गेल्या काही काळात जनावरांच्या खरेदी-विक्रीची मागणी वाढल्याने अतिरिक्त बाजार दिवसाची आवश्यकता निर्माण झाली होती. याच पार्श्वभूमीवर आता आठवड्यातून दोनदा बाजार भरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांसाठी अधिक चांगला बाजारपेठेचा पर्याय उपलब्ध होणार असून व्यापाऱ्यांनाही व्यवहारासाठी अधिक संधी मिळणार आहेत. परिणामी व्यवहार अधिक सुलभ होऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.






